परभणी:आपल्या काळजाचा तुकडा म्हणजेच आपली मुलं दृष्टीआडही होणे अत्यंत वेदनादायी असते, पण गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावलेल्या मुलांची आणि पालकांची भेट परभणी पोलिसांनी घडवली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यांतही पाणी तरळले.
मुलांना पळवून नेऊन बाहेर राज्यात लाखो रुपयांना विकणाऱ्या एका टोळीचा परभणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीतील सदस्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी संबंधित बालकांना सुखरूप आपल्या पालकांच्या हवाली केले आहे.लहान मुलांचे नातेवाईक किंवा संबंधितांकडूनच अपहरण करवून ही टोळी बाहेर राज्यातील इच्छुक पालकांना५ ते ६ लाख रुपयांना विकत होती. अशी माहिती परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी दिली.विशेष म्हणजे, या टोळीमध्ये महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी या टोळीकडून चार वर्षांच्या मुलाची सुटका केल्याची माहितीही प्रसिद्धी पत्रकामार्फत माध्यमांना दिली.१ एप्रिल २०२२ रोजी परभणीतील रहिवासी असलेल्या शाहीन (बदललेलं नाव) यांनी त्यांच्या ८ वर्षांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणसंदर्भात गुन्हा नोंद करून तत्काळ तपास सुरू केला.पोलिसांनी हे प्रकरण अनैतिक मानवी तस्करी विभागाकडे वर्ग केले. AHT Unit मधील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास अत्यंत कसोशीने करत इतर अपह्रत बालकांचीही माहिती घेतली.दरम्यान, अपहरणकर्त्यांचा सुगावा लागल्यानंतर त्यांच्यावर एक महिना अत्यंत गोपनीय पद्धतीने पाळत ठेवण्यात आली. सखोल तपासानंतर पोलिसांना हे प्रकरणाचा गुंता सोडवण्यास यश मिळालं.सदर प्रकरणात पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतलेल्या 10 आरोपींमध्ये 7 जण परभणीतील रहिवासी आहेत, तर अन्य मुंबई, हैदराबादचे असून एका विधी संघर्षग्रस्त मुलाचा यात समावेश आहे. शिवाय, एका महिलेला नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे.मुलं खरेदी करण्यासाठी या टोळीचे नेटवर्क शेजारील राज्यात पसरलेले होते. तर निपुत्रिक दाम्पत्यांना मुलं विकण्यासाठी या टोळीने महाराष्ट्रातील काही शहरांना लक्ष्य केलं होतं.या टोळीला वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळी मदत करत असावीत, असा दाट संशय पोलिसांना असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.महिलांचा समावेश असलेली ही टोळी भुरट्या चोरांची नाही, तर ही लहान मुलांना चोरून आंध्र-तेलंगणात विकणारी अत्यंत चालाख टोळी आहे.
गुप्त माहितीच्या आधारे परभणी पोलिसांच्या पथकाने 5 महिलांसह त्यांच्या सहा साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलीस तपासात आरोपींनी धक्कादायक माहिती दिली आहे. काही मुलांना निपुत्रिक दाम्पत्यांना विकल्याचं टोळीने कबूल केलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर टोळीची गुन्हा करण्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) विशिष्ट अशी होती.जे लोक पैशांच्या गरजेसाठी स्पर्म डोनेशन किंवा सरोगसीसाठी तयार असलेल्या लोकांना ही टोळी टार्गेट करत असे.त्यांना सांगत की पैशांची गरज असेल तर आम्ही सांगतो ते काम करा तुम्हाला जास्त पैसे मिळतील. यानंतर त्यांनी लहान मुलांचे अपहरण करावे, यासाठी ते त्यांना तयार करत.हे लोक बहुतांशवेळा आपल्या शेजाऱ्यांची किंवा नातेवाईकांची मुलं पळवून त्यांच्याकडे आणत.अनेक वर्षांपासून मूल होऊ शकत नसलेले पालक, IVF ची ट्रिटमेंट सुरू असलेलं जोडपं, किंवा सरोगसीसाठी महिलेचा शोध घेत असलेल्या लोकांचा ते माग काढायचे.मूल अशा पद्धतीने जन्माला घालण्याऐवजी आम्ही तुम्हाला थेट मूल मिळवून देऊ, असं ते त्यांना सांगायचे.यानंतर चोरलेली मुले त्यांच्या हवाली केली जात असत. यासाठीचे व्यवहार लाखो रुपयांमध्ये केले जायचे.परराज्यातून लहान मुलांचे अपहरण करणं आणि निपुत्रिक दाम्पत्यांना त्यांची विक्री करणं अशी या टोळीची कार्यपद्धती होती.ही टोळी 80 हजारापासून ५ लाख रुपयांपर्यंत पैसे उकळून मुलांची विक्री करायची.आंतरराज्य पद्धतीने कार्य करणाऱ्या या टोळीला त्या-त्या राज्यांतील काही गुन्हेगार मुलं पळवण्यासाठी मदत करत असावेत, असा संशय पोलिसांना आहे.तसेच, या टोळीने श्रीमंत मात्र बाळ नसलेल्या दाम्पत्यांना शोधण्यासाठी मोठ्या शहरात खास नेटवर्क उभारल्याचा संशय पोलिसांना आहे.ज्या ठिकाणची मुलं चोरीला गेली आहे त्या पालकांशी बोलून संशयित कोण आहे, याविषयी पोलिसांनी माहिती घेतली. यानंतर संशयितावर त्याच्या नकळत पाळत ठेवण्यासाठी एक विशेष पथक नेमलेलं होतं.हे पथक संशयितांच्या सर्व हालचालींची नोंद घेत होतं. सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांचं पथक संपूर्ण तयारीनिशी त्यांच्या ठिकाणांवर छापा मारत.पुढे, त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील ‘लिंक’ हाती लागायची. त्यातून एजंटची माहिती आणि सूत्रधारांची माहिती हाती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत होते.’परभणी पोलिसांनी ज्या राज्यात ऑपरेशन आहे तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन छापे मारले आणि त्या एजंट्सला पकडले. एकदा एजंटला पकडल्यावर मूल कुठे विकली आहे त्याची माहिती हाती यायची आणि त्या संबंधित लोकांकडून आम्ही मूल सोडवून आणायचो,’ असं या टीमचा भाग असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश कौठकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.पोलिसांच्या सात टीम, एक वॉच ठेवणारी टीम आणि सायबर पोलीस अशा नऊ पथकांनी पोलीस अधीक्षक रागसुधा R. यांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.नव्या पालकांकडून मूल सोडवून आणण्याची प्रक्रिया ही थोडीशी अवघड वाटायची कारण जरी त्यांनी अपहृत झालेले मूल घेतले आहे तरी ते त्या मुलांना अतिशय प्रेमाने वाढवू लागले असायचे. त्यांच्याकडून ते मूल घेऊन आम्ही मूळ पालकांकडे ते सुपूर्द करायचो, असं पोलिसांनी सांगितलं.आतापर्यंत परभणी पोलिसांनी सहा मुलांना सोडवलं आहे. त्यापैकी चार मुलं ही परभणी जिल्ह्यातीलच आहेत.रंगारेड्डी, एनटीआर आणि विजयवाडा या जिल्ह्यातून मुलांची सुटका करण्यात आली.मुलं विकणारी टोळी गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय असल्याने त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.सध्या परभणी पोलिसांचे एक पथक परराज्यामध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करत असून या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा R.यांनी दिली आहे.