छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू झाला असला तरी राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात पडलेल्या पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसलाय. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी या संदर्भात कृषी विभागानं महत्त्वाचा सल्ला दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून ऋतूचक्र बदलल्याचं पाहायला मिळतंय. हवामानातील बदलाचा मोठा परिणाम पिंकावर झालाय. मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडलाय. त्यामुळे काढणीला आलेले गहू, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यासोबत उन्हाळ्यात ज्याची सर्वाधिक प्रतीक्षा असते त्या आंब्याच्या मोहरावरही याचा दुष्परिणाम दिसत आहे. या सर्व नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी वाढली आहे.
सर्व शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची मळणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास पीक ढीग मारुन ताडपत्रीनं झाकून ठेवावं. काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीसाठी तयार असलेल्या भाजीपाला आणि फळ पिंकाची काढणी करुन घ्यावी. त्याचबरोबर परिपक्व झालेल्या टरबूज फळांची काढणी करुन अपरिपक्व फळं गवतानं झाकावीत. त्याचबरोबर पाऊस सुरू असताना पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधावे, असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.
गहू : पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस आलेल्या व तयार झालेल्या पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी काढणे केलेल्या शेतात पिकाचे अवशेष जाळू नयेत तर ते मूळ ठिकाणी कुजवावेत यासाठी एकरी 50 किलो युरिया व 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात शेतात पसरवावे व नंतर पलटी नांगरणी करून घ्यावी यामुळे येणाऱ्या हंगामापर्यंत अवशेष कुजून उत्कृष्ट खत तयार होईल.
रब्बी पिकांची काढणी आणि मळणी केल्यानंतर तयार झालेले धान्यात किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धान्यातील ओलावा दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवावा. धान्य साठवणुकीच्या पूर्वी उन्हात योग्यरीत्या वाळवून घ्यावे. त्यामध्ये एक ते दोन टक्के कडुलिंबाचा पाला मिसळवावा.
आंबा: आंबा फळाची गळ कमी करण्यासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 100 ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फळे वाटाणा घोटीव सुपारीच्या आकाराची असताना स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला: पावसाळ्याचे वातावरण असल्यामुळे काढणीस आलेल्या भाजीपाला लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काढून घ्यावा भेंडी पिकावर भेंडी पिकावरील तुडतुडे मावा किड्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट 30 इसी व 23 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.हाता तोंडांशी आलेले पिक पावसामुळे मातीत मिळालंय. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भविष्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या कृषी सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन केले तर त्याचा फायदा होईल असं शेतकरी नवनाथ इधाटे यांनी सांगितलं