मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या निमित्ताने विरोधक सध्या महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. महाविकास आघाडीवर टीका करताना धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सोबतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. संजय राऊत शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.
“विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे”. “प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे .