Home बृहन्मुंबई महानगरपालिका प्रसूती मृत्यू चिंताजनक! ६ वर्षांत राज्यात ७५१६ गर्भवती महिला दगावल्या, अशी आहेत...

प्रसूती मृत्यू चिंताजनक! ६ वर्षांत राज्यात ७५१६ गर्भवती महिला दगावल्या, अशी आहेत कारणं…

779
0

मुंबई : महिला व मुलांच्या आरोग्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या जात असल्या तरीही त्यांची अंमलबजावणी सक्षमपणे होते काय, असा प्रश्न राज्यातील प्रसूतीवेळी होणारे मृत्यूचे आकडे पाहून उपस्थित होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडील माहितीनुसार मागील सहा वर्षांमध्ये राज्यात साडेसात हजार महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे दिसून येते. यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूची संख्या १२६१ इतकी आहे.

राज्य कुटुंबकल्याण विभागाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार सन २०१७ ते २०२२ (डिसेंबरपर्यंत) राज्यात ७५१६ महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. २०१७-१८च्या तुलनेत सन २०२१-२२पर्यंत ही संख्या वाढलेली दिसते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये अनुक्रमे १८६, २३५, २६०, २०१, ३२४, १६१ महिलांचे प्रसूतीदरम्यान मृत्यू झाले. याचाच अर्थ एकूण मृत्यूंपैकी १८ टक्के मृत्यू हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. महिला आरोग्य व कुटुंबनियोजन कार्यक्रमामध्ये सक्रिय असलेल्या डॉ. एम. एस. मोहिते यांनी, शहरी ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांमध्ये विविध घटकांचा प्रभाव असल्याचे सांगितले.

राज्यात ‘माहेरघर’सारखी उपयुक्त योजना आदिवासी भागामध्ये प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने १४ मार्च रोजी लाभार्थ्यांच्या आकडेवारीसह निदर्शनास आणून दिले होते. प्रभावी अंमलबजावणी झाल्यास साह्यभूत ठरू शकणाऱ्या या योजनेचा लाभ मागील पाच वर्षांत गर्भवती महिलांनी मोठ्या संख्येने घेतला नसल्याचे त्यातून दिसून आले होते. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी, या योजनेच्या माध्यमातून बुडलेला रोजगारही त्या महिलेच्या कुटुंबास देण्यात येत होता. आर्थिक विवंचना सुटली, तर गरजू महिला केंद्रामध्ये प्रसूतीसाठी येताना आश्वस्त असतात, असे दिसून आल्याचे सांगितले.

शहरी भागामध्ये महिलांमधील अॅनिमिया, संसर्ग, अनुवांशिक आजारासंदर्भात माहिती नसणे, उच्चरक्तदाब या कारणांमुळेही प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू दिसून येतात. मागील काही वर्षांत प्रगत औषधोपचार आणि तंत्रज्ञानाचा वेग वाढल्यानंतर प्रसूतीप्रसंगी होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याची खंत स्त्रीरोगतज्ज्ञ वनिता मोरे यांनी व्यक्त केली.

अॅनिमिया, रक्त कमी असणे, अतिरिक्त रक्तस्राव, प्रसूतीनंतर लगेच होणारा संसर्ग, रुग्णवाहिकांच्या सुविधा न मिळाल्याने आरोग्य केंद्रामध्ये पोहोचण्यास उशीर होणे, अपुऱ्या दिवसांची प्रसूती, उच्च रक्तदाब अशी विविध प्रकारची कारणे यात दिसून येतात. ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये आजही घरी प्रसूती करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अस्वच्छता तसेच नाळ कापताना होणारा संसर्ग यामुळेही होणारे मृत्यू अधिक आहेत. ग्रामीण; तसेच आदिवासी भागामध्ये अंधश्रद्धा अधिक आहेत. अनेक ठिकाणी प्रसूती सुरळीत व्हावी यासाठी आजही झाडपाल्याची औषधे दिली जातात. लवकर प्रसूती व्हावी यासाठी गर्भवती महिलांना कमी खायला दिले जाते. प्रसूतीच्या दिवसांपर्यंत ती कष्ट करते.

प्रसूतीदरम्यानचे मृत्यू

२०१७ : ११८४
२०१८ : १२६१
२०१९ : १३३४
२०२० : १२७५
२०२१ : १४८८
२०२२ : ९७४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here