मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्ले चढवत असल्याने संघर्षाला अधिकच धार चढली आहे.पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील हे दोघे याच विभागातील असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या विभागात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील हे नेमकी नस हेरून या निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना लक्ष्य करत आहेत.
एकीकडे शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. आज सांगोला येथील प्रचारासाठी आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत टोलेबाजी केली. ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय आमच्या विरोधकांना झोपच लागत नाही’, असा टोला पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला. शिवसेनेने धमकीची भाषा वापरू नये, असे सांगताना मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे, असा इशाराच पाटील यांनी दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कसंबसं एक वर्ष झालं असलं तरी हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे,असेही पाटील बोलले .