रत्नागिरी :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रत्नागिरीमधील खेडमध्ये सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांची सभा झालेल्या गोळीबार मैदानावरून मुख्यमंत्री शिंदे यांची तोफ धडाडली. दरम्यान, या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
जो व्यक्ती आपल्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. पक्षाचा अध्यक्ष होण्याची राहुल गांधी यांची क्षमता नाही. जो राज्य जिंकू शकत नाही, तो पंतप्रधान कसा होऊ शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
‘काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, त्यामुळे काँग्रेसला कधीही जवळ करू नका, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि त्यांची भूमिका होती. अशांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मतं मागतात. त्यामुळे तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली आहे. त्यामुळे आम्हाला तुमची संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाले हीच आमची संपत्ती आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.