मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश प्रदान
औरंगाबाद : शहरासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी महापालिकेत केले. राज्य सरकारने पालिकेतील १८७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या आदेशाचे प्रदान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राज्य सरकारने महापालिकेतील १८७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेवून २८ सप्टेंबर रोजी आदेश काढण्यात आले. सेवेत कायम करण्यात येत असल्याचे आदेश प्रदान करण्याचा कार्यक्रम महापालिकेत घेण्यात आला. स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पाच कर्मचाऱ्यांना आदेश प्रदान करण्यात आले. तसेच पदोन्नती देण्यात आलेल्या ३४ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी पाच अधिकाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आले. याप्रसंगी खासदार इम्तीयाज जलील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाट, प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रविंद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त सुमंत मोरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, प्राणिसंग्रहालयाचे संचालक बी. एस. नाईकवाडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त नेमाने यांनी केले तर सुत्रसंचलन संजय सोनार यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त निकम यांनी मानले.
पालकमंत्री देसाई यांनी सेवेत कायम करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांसमोर मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धडकेबाज निर्णय घेवून त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु केली आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गतीमान कार्यपध्दती राबविण्यास सुरुवात केली. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत मनपा कारभाराचे डिजीटिलायझेनचे काम सुरु करुन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगाने पादर्शक व लोकाभिमुख योजना राबवून नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच रस्त्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली असून ही काम सुरु करण्यात आली आहेत. कचरा व्यवस्थानात अनेक अडचणीवर मात करुन हे काम पुढे नेण्यात येत आहे. रस्ते, पाणी, घनकचरा या कामाचे चांगले परिणाम दिसून येत आहे. मनपाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम कायम सुरु राहणार आहे. असेही पालकमंत्री देसाई म्हणाले.
पालकमंत्र्याच्या हस्ते आदेशाचे वाटप
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येत असल्याचे आदेश प्रदान करण्यात आले. त्यामध्ये अफजलुन्नीसा नहेरी बशीर शेख, अफसर अब्दुल हमीद सिद्दिकी, सुभाष हरिदास धांडे, मनिषा किसनराव पाटील, जयश्री वसंत जोशी या कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक, नोंदणी लिपीक पदस्थापना देण्यात आली.
पदोन्नती देण्यात आलेले अधिकारी- कर्मचारी
महापालिकेतील ३४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामध्ये मुख्यलेखाधिकारीपदी संजय पवार, विधी सल्लागार अपर्णा थेटे यांना उपायुक्तपदी, उपअभियंता सुनिल दशरथ काकडे यांना कार्यकारी अभियंतापदी, शाखा अभियंता अब्दुल फारुख खान यांना उपअभियंतापदी, दुय्यम आवेक्षक गंगाधर भांगे यांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती आदेश देण्यात आले.