Home कृषी 30 जिल्ह्यात गारांसह वादळी पावसाचा इशारा

30 जिल्ह्यात गारांसह वादळी पावसाचा इशारा

314
0

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मराठवाडा, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अन्य काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटामुळे केळी, गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर वादळी पावसाचा इशारा कोकणमधील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात पाऊस होणार आहे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव याभागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम. यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल (ता. 17) विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईसाठी मदत मागण्यात आली आहे.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात तुफान गारपीट झाली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. 18) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे अनेक भागांत सूर्यदर्शन झाले नाही. तर अनेक ठिकाणी ऊन, सावल्यांचा खेळ सुरू असल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.

शुक्रवारी (ता. 17) वर्धा येथे राज्यातील उच्चांकी 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्याही खाली घसरले आहे. राज्यात कमाल तापमान 24 ते 35 अंशांच्या दरम्यान होते. यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. 18) राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा कायम आहे. अनेक जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांत राज्यात पुणे 31.5 (15.2), जळगाव 30.7 (22.2), धुळे 30 (16), कोल्हापूर 33.7 (20.8), महाबळेश्वर 27.4 (13.4), नाशिक 24.7 (16.2), निफाड 31.6 (14.5), सांगली 33.2 (19.8), सातारा 30.1 (16.4), सोलापूर 34.4 (20), रत्नागिरी 32.7 (23.7), छत्रपती संभाजीनगर 24.2 ( 13), नांदेड 31.6 (19.6), परभणी 30.4 (19.2), अकोला 27.1 (18.2), अमरावती 28.6 (16.3), बुलडाणा 26.5 (18.5), चंद्रपूर 32.0 (21), गडचिरोली 31.2 (18.4), गोंदिया 30.4 (19.6), नागपूर 30 (17.7), वाशिम 26.2 (16 ), यवतमाळ 28 (16.5) तापमानाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here