मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले तरी मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी असे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसे सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे.
शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहिल्याने प्रशासनाला तयारीसाठी बराच वेळ मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये टेस्टिंग कॅम्प सुरु आहेत. सॅनिटायझेशन केले जात आहे. ही मास टेस्टिंग मोहीम कालपासूनच महापालिकेने राबवायला सुरुवात केली आहे. शिक्षकांच्या टेस्टिंग करणे,त्यानंतर काळजी घेण्याच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे याच्या तयारीसाठी महापालिकेला ३१ डिसेंबरपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.