राज्यात पुन्हा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात येत्या ५ दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाशी, संबंधित सोसाट्याचा वारा येण्यासाठी आयमडीद्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. खालील चेतावणी १५-१८ मार्च पर्यंत आहेत. आज महाराष्ट्रासाठीही TS इशारा देण्यात आला आहे.शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. १६आणि १७ मार्चला तीन दिवस विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे.मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. १६मार्चपर्यंत मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते.तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तात्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असा या अलर्टचा अर्थ आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण सध्या शेतीपिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आला तर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष बागांची देखील काढणी सुरु आहे. अशातच पाऊस किंवा गारपीट झाल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.