सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप रेणू शर्मा महिलेने लावला आहे. त्यामुळे सध्या धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तर विरोधकांकडून त्यांच्यावर सध्या निशाणा साधला जात आहे. आता त्यांचे जिवलग मित्र अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर मत व्यक्त करत आपल्या मित्राची बाजू मांडली आहे. अमोल कोल्हे सांगलीतील म्हैसाळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढया नैतिकतेची अपेक्षा करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का?,” अशी विचारणा अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, “विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे. त्यांनी जर आरशात पाहिलं तर त्यांच्या मागण्या रास्त ठरतील असं वाटत नाही”. यावेळी त्यांनी धनंजड मुंडे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून तेच यावर अधिक बोलतील असं सांगितलं.