मराठवाडा साथी न्यूज
बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे बुधवारी पहाटे स्पष्ट झालं. बुधवारी पहाटे सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट झालं आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाने ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष होण्याचा पराक्रम केला. पण राजदचा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसला केवळ १९ जागांवर विजय मिळवता आला.
अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमदेवार पराभूत झाले. यामुळेच आता काँग्रेसचे प्रवक्ते उदित राज यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. राज यांनी ईव्हीएम हँकींगवरुन सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये अंमली पदार्थांच्या बाबतीत नाव समोर आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दीपिका पादुकोण यांच्याशी संबंध जोडणारे ट्विट केलं आहे. राज यांनी या दोन अभिनेत्रींचे व्हॉट्सअॅप चॅट समोर येण्याचे उदाहरण देत व्हॉट्सअॅप हॅक केलं जाऊ शकतं तर ईव्हीएम का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.