सुमारे ४०० ते ५०० अज्ञातांविरोधात १८कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे ४०० ते ५००अज्ञातांविरोधात १८ कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरु केली होती. सगळ्याच आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. समाजकंटकांनी एकूण १८ गाड्या जाळल्यात. यात पोलिसांच्या १५तर खासगी ३ गाड्यांचा समावेश आहे. जाळपोळीत 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर दगडफेकीत १६ पोलीस जखमी झालेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत झालेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरामध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला असून संभाजीनगराला छावणीचं स्वरूप आलं आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील किरकोळ वादातून दंगल उसळली. यात १५ पोलीस जखमी झाले आणि अनेक वाहने जाळण्यात आली आहेत. या दंगलीमुळे भाजप राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडातील विरोधकांनी केला आहे. दरम्यान, दंगलीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच यातील दंगखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही दंगल दुर्दैवी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दंगलीचे कारण अस्पष्ट आहे आणि काही जणांनी भडकाऊ भाषण दिल्याचा दावा केला आहे तर पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलेय, किराडपुरा शहरातील काही दुचाकीस्वार तरुणांत किरकोळ भांडण झाले. त्यांच्यातील वाद टोकाला गेल्यानंतर दंगा उसळला. दरम्यान, शेकडोच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला, मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिसांच्या मालकीची वाहने जाळली. त्यानंतर आणखी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. यात १५ पोलीस जखमी झालेत.