मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची आज चक्क विधानसभेत चर्चा रंगली. या खुमासदार चर्चेदरम्यान फडणवीसांना आदित्य ठाकरेंची चांगलीच फिरकी घेतली. त्यावर आदित्य ठाकरेंनीही तातडीनं प्रतिक्रिया दिली, यामुळं काही काळ सभागृहात हास्याचा तडका पहायला मिळाला.
सुरुवातीला भाषणादरम्यान बच्चू कडू आपला मुद्दा मांडताना म्हणाले, “लग्न कामगार आहे म्हणून केलं पण आता लग्न तुटलं तर त्याला कोण जबाबदार आहे? सरकारनं याची जबाबदारी घेतली पाहिजे. याच्यासाठी काही धोरण आखणार आहात का? हा मूळ प्रश्न आहे”
कडू यांच्या या विधानावर मिश्किल टिप्पणी करताना फडणवीस म्हणाले, “लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटल्यानंतर त्याला सांभाळायची जबाबदारी सरकारची. पण आपण जी सूचना केली आहे ती जरुर तपासून पाहता येईल तसेच त्यावर काही धोरण तयार करता येईल का ते पाहता येईल”
फडणवीस पुढे म्हणाले, “पहिल्यांदा तर बच्चू कडूंनी हा प्रश्न आदित्यजींकडं पाहुन विचारला होता का? सरकारनं लग्न लावायचं…त्यावर आदित्य ठाकरे आपल्या जावेवरुनचं म्हणाले, “नको नको” मग फडणीस मिश्किलपणे पुन्हा म्हणाले, “सरकार याची जबाबदारी घ्यायला तयार आहे”
फडणवीसांच्या या टिप्पणीवर आदित्य ठाकरे पुन्हा म्हणाले की, “ही काही राजकीय धमकी आहे का? की तुम्ही आमच्यासोबत बसा अन्यथा तुमचं लग्न लावून देऊ” आदित्य ठारेंच्या या प्रतिक्रियेनंतर सभागृहात एकच हशा पिकला.