सामनाच्या अग्रलेखातून योगी आदित्यनाथवर शिवसेनेची टीका – उत्तर प्रदेशची तुलना केली मिर्झापूर वेबसिरीजशी
मुंबई : श्रीकृष्णाने त्याचा मित्र सुदामाचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याबदल्यात श्रीकृष्णाने त्याची पूर्ण नागरी सोन्याची बनवली. अशी सोन्याची नागरी करणारा श्रीकृष्ण आणि पोहे खाऊ घालणारा सुदाम योगी आदित्यनाथांनी शोधावा असा सल्ला सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेने योगींना दिला आहे.
उत्तर प्रदेशात “मायानगरी “उभारण्याचा संकल्प केलेल्या मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मुंबईतील उद्योगपती,कलाकार यांची भेट घेतली. मुबईतील फिल्मसिटी पळवून नेण्याचा निर्धार केलेल्या योगीवर शिवसेनेने जोरदार प्रहार केला आहे. उत्तर प्रदेशमधील बेरोजगारी ,जातीयता , अशिक्षितपण , दारिद्र्यता हि परिस्थिती मिर्झापूर या वेबसिरीजमधल्या मिर्झापूरसारखीच आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशची तुलना मिर्झापूरशी करत त्याला मिर्झापूर ३ असे टायटल दिले आहे. योगींना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झाला व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही.असा चिंता काढत योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे.
‘योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार? त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये? पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली. अशा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते ते पाहायला हवे,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.
गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्म सिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही.
उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का?असा सवाल शिवसेनेने योगींना विचारला आहे.
उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार?असा चिंता शिवसेनेने काढला आहे.