Marathwada Sathi

महागाई कमी होणार की आणखी वाढतच जाणार?

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांतर्गत मोठ्या घोषणा केल्या आणि देशाच्या जीडीपी तसेच चलनवाढीच्या संदर्भात असे अंदाज दिले आहेत जे ऐकून तुम्ही खुश व्हाल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँक ग्राहकांना मोठा दिलासा दिला आणि रेपो दरात तूर्तास कोणताही बदल न करण्याची घोषणा केली. मे २०२२ पासून सलग सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकेचा व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ३ एप्रिलपासून सुरू झाली असून आज ६ एप्रिल रोजी पतधोरणातबाबत घेतलेला निर्णय जाहीर करण्यात आला. या घोषणेदरम्यान आरबीआने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कोणताही बदल न केल्याने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर अजूनही केवळ ६.५ टक्के आहे. महागाईबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, मूळ चलनवाढीचा दर अजूनही वरच्या पातळीवर आहे आणि तो आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कमी होण्याची अपेक्षा आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) ५.३% वरून ५.२ टक्क्यांवर येऊ शकतो. तसेच आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय आधारित महागाई ५% वरून 5.१ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. याशिवाय दुसऱ्या तिमाहीत सीपीआय ५.४ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत सीपीआय ५.६% वरून वरून ५.२ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत आर्थिक स्थिरता अजूनही एक आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढ ६.५% राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ७.८ टक्के असू शकते आणि आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ५.९% असू शकते.

Exit mobile version