Marathwada Sathi

वीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी करणार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

वीर सावरकर यांची जयंती ( २८ मे ) राज्य सरकारतर्फे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या विविध कार्यक्रमांचे प्रचार-प्रसारासाठी आयोजनही करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत सांगितले की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, “मी कोणाला घाबरत नाही. मी गांधी आहे, सावरकर नाही. मी सभागृहात असो किंवा बाहेर फरक पडत नाही. मी आवाज उठवत राहिल,” असे विधान केले होते.

राहुल गांधींच्या विधानानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तर, महाराष्ट्रात शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपाच्या वतीने सर्व जिल्ह्यांतून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आलेली. तेव्हाच मंत्री उदय सामंत यांनी वीर सावरकर यांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आज ( ११ एप्रिल ) मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.

Exit mobile version