मराठवाडा साठी न्यूज
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए १२५ जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी ११० जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने ७४ जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या आणि राजदने ७५ जागांवर विजय संपादन केले , परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या १९ जागा मिळाल्या.
बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने देखील आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळाली. कित्येक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. अशातच शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजपला चिमटा काढत असलेले पाहायला मिळालं.
भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत यावरून संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. “संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात, शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे,” असा टोला निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावलाय.
शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून ९०० मते शिवसेनेला मिळाली होती, असा घणाघात देखील त्यांनी लगावला आहे.