Marathwada Sathi

आमच्या मुळावर येईल त्यांची जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही…!

मराठवाडा साथी न्यूज
जालना :
आपल्यातील काही समाज थोडे पुढे गेले असतील पण भटका समाज अजूनही खूप मागे आहे. १२ बलुतेदारांची अवस्था वाईट आहे, मी विश्वासाने सांगतो बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबाबतची कारवाई सुरू केली असल्याचे ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जालना येथील ओबीसी मोर्चात ते काल बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, आजचा ओबीसी समाजाचा मोर्चा हा कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा पक्षाविरुद्ध नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. राज्यातील अनेक जिल्हय़ातील अठरा पगड जाती आणि ओबीसी समाजातील बहुतांशी कुटुंब आजही अर्धपोटी राहून जीवन जगत आहे.
ओबीसी समाजामध्ये सतत भांडण लावण्याचे काम करून काही मंडळींनी सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले आहेत. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू नये, असा ओबीसी समाजाचा हेतू मुळीच नाही. परंतु आमच्या मुळावर येईल त्यांची जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून दिला.ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण मोर्चात सहभागी होत आहोत आणि मंत्री म्हणून व्यथा ऐकणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी ओबीसी मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आल्याबद्दल सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version