Marathwada Sathi

हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे……

संजय राऊत यांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे सध्या ते चर्चेत आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार योग्य निर्णय घेतील असं सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला.“राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

Exit mobile version