मराठवाडा साथी न्यूज
नवीदिल्ली : एपीएमसीच्या संदर्भात वारंवार पत्रकरांनी प्रश्न विचारून हैराण केल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार वैतागले आणि म्हणाले, ‘मी तुम्हाला इथे बोलावुन चुक केली आहे. यापुढे मी तुम्हाला बोलावणार नाही. मी त्या पत्रात काय लिहीले आहे, ते निट वाचा. मी एपीएमसी मध्ये सुधारणा सुचविल्या आहेत. मोदींच्या कायद्यामध्ये एपीएमसीचा उल्लेखच नाही.’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
कृषी कायद्यावरून देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे वाक् युद्ध पेटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना २०१० च्या कथित पत्राबद्दल सवाल विचारला असता त्यांनी यावर खुलासा केला. पण पत्रकारांनी वारंवार एकच प्रश्न रेटून लावुन धरल्याने शरद पवारांचा संयम सुटला आणि ते पत्रकारांवर भडकले. शरद पवार यांनी दिल्ली संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत ही भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी आपण शेतकरी आंदोलनावर बोलणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले होते.
पण, भाजप नेत्यांनी २०१० चे तुमचे पत्र दाखवून आरोप केला आहे, असे पत्रकारांनी विचारले असताना पवार म्हणाले की, ‘मी पत्र लिहिले होते ते खरे आहे. पण, माझ्या पत्राचा जी लोक उल्लेख करीत आहे. त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असे लिहीलेले आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे. त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, अशी टीका पवारांनी केली. ‘आम्ही उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ५:३० वाजता भेट घेणार आहोत. त्यावेळी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत’ असंही पवार म्हणाले.
एपीएमसीचा प्रश्न ‘भक्त’ पत्रकारांनी लावुन धरल्याने पवार चांगलेच संतापले. ‘तुम्ही लोक बाहेर उभे होते, ते पाहून मला बरे वाटले नाही म्हणून मी तुम्हाला इथे बोलावले. पण, उत्तर देऊनही तुम्ही एकच प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. मी तुम्हाला इथे बोलावून चुकी केली आहे, यापुढे तुम्हाला बोलावणार नाही’ असे म्हणत पवार पत्रकारांना उत्तर न देता निघून गेले.