Marathwada Sathi

कार बाईकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

अमरावती : शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते अमरावती येथे पक्षातील पदाधिकाऱ्याच्या लग्नाला खाजगी कारने जात होते. यावेळी अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील अकोला रस्त्यावर गोळेगाव नजीक त्यांची स्विफ्ट डिझायर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वारासह कारमधील दोघे असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना काल सायंकाळी सात वाजता घडली.

बुलढाणा येथील हे सर्व कार्यकर्ते शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे विभागीय अध्यक्ष पवन देशमुख यांच्या लग्नाला अमरावती येथे दर्यापूर मार्गे जात होते. यावेळी गोळेगाव नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वारास भरधाव कारने धडक दिली. यानंतर नियंत्रण सुटून ही कार जवळच असलेल्या विजेच्या खांबावर आदळली.हा अपघात एवढा जबरदस्त होता, की कार धडकताच विजेच्या खांबासह कारचा देखील चुराडा झाला. या धडकेत दुचाकीस्वार सचिन रामकृष्ण दुधंडे (वय ३५ वर्ष, राहणार लासुर) हा जागीच ठार झाला, तर कारमध्ये असलेल्या पाच जणांपैकी दोघा जणांना रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यूने गाठले.

मृतांमध्ये प्रतीक राऊत (वय २५ वर्ष, रा. बुलढाणा) व प्रफुल नानाजी गावंडे (वय २८ वर्ष, रा. बुलढाणा) यांचा समावेश आहे. तर या अपघातात शुभम नागपुरे (२८), शुभम दुर्गे (२४) व पावन रामचंद्र तायडे (२७) (सर्व रा बुलढाणा) जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेले हे तिघेही गंभीर अवस्थेत असून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील ड्युटीवर असलेले डॉक्टर संतोष डाबेराव यांनी त्यांच्यावर उपचार करत तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या कारच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या किशोर हिंडोळे (रा बुलढाणा) यांनी अपघाताची माहिती दिली. दर्यापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सर्व मृत व जखमींना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी तातडीने धाव घेत रुग्णसेवा दिली. नाना माहुरे, अनंत गावन्डे, विनय गावन्डे, शरद ठाकरे, सुनील अपराधी व सचिन शेलारे यांनी मदत केली.

Exit mobile version