मराठवाडासाथी न्यूज
अहमदनगर : अहमदनगर मधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस निरीक्षक आज दुपारी या संदर्भात पत्रकार परिषद घेणार असून पोलीस त्यामध्ये हत्येचं कारण आणि खरा सूत्रधार कोण याबाबत माहिती देतील अशी शक्यता आहे. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव इथल्या घाटात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली होती. रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. ३०नोव्हेंबरला पुण्यातून आपलं काम आटोपून मुलगा आणि आईसोबत नगरकडे येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन रेखा जरे यांची हत्या केली.