मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली ला मुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावत २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगना रनौतला याआधी जेव्हा समन्स पाठवण्यात आले होते. तेव्हा तिने आपल्या भावाचं लग्न असल्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं होतं. पेशाने वकील आणि तक्रारदार महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी गेल्या महिन्यात मुंबई वांद्रे कोर्टात रंगोली आमि कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी सेक्शन 121, 121A, 124A,153A ,153B, 295A, 298 आणि 505 अंतर्गत कंगनाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.
अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.