Marathwada Sathi

मेट्रो कारशेडचे काम थांबण्यासंदर्भात ठाकरे सरकारला आदेश


मुंबई : ठाकरे सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे.

आरेची ८०० एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे. त्यानंतर कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. पण, आता केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला आहे.

दरम्यान, मुंबईचा विकास कसा रोखायचा यासाठी केंद्रातील सरकार नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली आहे.
‘राज्य सरकारने पर्यावरणाचा संरक्षण करत आरे येथील प्रकल्प कांजूरमार्गाला हलविला होता. पण, आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या मुद्द्यावरून राजकारण करत आहे यावरून हेच स्पष्ट होते की, महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला पचनी पडत नाही. या पद्धतीने इतर राज्यांमध्ये भाजप कार्यरत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील हेच पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असंही असलम शेख म्हणाले.

Exit mobile version