Marathwada Sathi

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर संताप

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर अंधारेंनी महिला आयोगात धाव घेतली. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.””छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो”, अशी चिंताही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.सुळे पुढे म्हणाल्या, “त्यातही बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.””आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version