मुंबई: वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून सोमवारी (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. ”करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे.” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. या ”करोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे.” असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेला आहे.