मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय काया पालट झाली आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे वेगवेगळ्या विचारसरणींचे पक्ष एकत्रित आले आहेत.मात्र,हे पक्ष जरी एकत्रित आले असले तरी,काँग्रेस ला वेळोवेळी डावलण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.दरम्यान,मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दलित आणि आदिवासी यांच्यासंदर्भातील योजनांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची होती. त्याचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
सोनिया गांधी यांनी पत्रात काय लिहिले
राज्यातील महाविकास आघाडीचा सहकारी म्हणून, काँग्रेस पक्ष समाजातील दुर्बल घटक, विशेषत: दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने वंचित-उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याची विनंती देखील सोनिया यांनी या पत्रातून केली आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. कर्नाटक आणि अविभाजित आंध्र प्रदेश यांच्या धर्तीवर अनुसूचित जाती व जमातीसाठी अर्थसंकल्पातील निधीचे संरक्षण करण्यासाठी कायदा करण्याची सूचना केली आहे.
पत्राद्वारे दिल्या या सूचना
- शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहाच्या सुविधा, विशेषत: निवासी शाळांचा विस्तार करणे आवश्यक आहे.
- सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण असावे, या समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास महत्त्वपूर्ण आहे, त्यास सर्वोच्च प्राधान्य मिळावे.
- राज्यातील शासकीय नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती व जमातीचा अनुशेष विशेष भरती मोहीम राबवून भरून काढावा.