मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना रुजवण्याला अधिक महत्व दिले. आता त्यालाच अनुसरून भाजपाने मुंबईमध्ये दादर येथे आत्मनिर्भर टी स्टॉल सुरु केले आहेत. बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. आत्मनिर्भर भारत खऱ्या अर्थाने प्रगत करत असल्याचं सांगत महाराष्ट्र भाजपाने या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही “आत्मनिर्भर चहा ” चा आस्वाद घेत याला शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपा नेत्यांचा “आत्मनिर्भर चहा “चा आस्वाद :
या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आत्मनिर्भर चहाचा आस्वादही घेतला.सोबतच सर्व भाजपा नेत्यांनीही या चहाचा आस्वाद घेतला.आत्मनिर्भर भारत ही केवळ एक प्रेरणादायी घोषणा नाही तर मोदीजींसह देशाच्या युवकांद्वारे करण्यात आलेला संकल्प आहे. आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आत्मनिर्भर टी स्टॉलचे उद्घाटन केले, अशा कॅप्शनसहीत चंद्रकांत पाटील यांनीही या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले. मला विश्वास आहे की, महाराष्ट्राचा प्रत्येक युवक आत्मनिर्भर होईल आणि आपल्या देशाला सशक्त करण्यामध्ये आपले सकारात्मक योगदान देईल. असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.बेरोजगार तरुणांना मार्ग दाखविण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तो राबविला जाणार आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून तरुणांना रोजगारासाठी सवलतीचे कर्ज उपलब्ध होते. त्याची माहिती देऊन, अर्ज भरून घेऊन आणि बँकांकडून कर्ज मिळवून देऊन चहाचे स्टॉल मुंबईत उभारले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजपने हा उपक्रम सुरू केला आहे.