Home Uncategorized औरंगाबाद की संभाजीनगर : राजकारण

औरंगाबाद की संभाजीनगर : राजकारण

457
0


औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. याच मुद्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले तर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. तर काँग्रेस, एमआयएम आणि आता रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) नेही आता संभाजीनगरला विरोध जाहीर केला आहे. या राजकारणावर वेगवगेळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या आहेत.


अजित पवार
अजित पवार म्हणाले, “औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावे यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू”

रामदास आठवले
“महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचे नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. मात्र, या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचे ठामपणे केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंने सांगितले आहे. औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळते आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवल्यानंतर आता रिपाइं आठवले गटानेही या नामांतराला विरोध असल्याचे सांगितले. रामदास आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध दर्शवला आहे.

संजय राऊत

“महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचे जसे बाबरशी नाते नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील. दरम्यान, नामांतरणाच्या मतभेदावरुन महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बाळा नांदगावकर

उद्धव ठाकरेंनीच मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.यासंदर्भातील एक बातमीचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शेअर केले आहे. या बातमीसह औरंगाबादच्या नामांतरणावरुन नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. ‘’संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे.’’, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेत्यांकडून संभाजीनगरच

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलो आहे. त्यामुळे, त्या शपथेची प्रतारणा होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरतांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here