Marathwada Sathi

राऊत यांनी मुंबईचं नाव घेऊ नये …..

मुंबई : भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले पन्नास वर्षे सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचं आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे,” असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. दरम्यान, यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावला.“शिवसेनेला सोनियांच्या १० जनपथचे पायपुसणे करणाऱ्या राऊतांनी मुंबईचे नाव घेऊ नये. त्यांनी केवळ आपल्या पक्षापुरते बोलावं,” असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला.


काय म्हणाले होते राऊत?

भाजपाला मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचं आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हाच जळून खाक होतील एवढी आग त्यात आहे,” असं राऊत म्हणाले होते.
“त्या भगव्यामध्ये लाखो, कोट्यवधी लोकांचा त्याग, रक्त सांडलं आहे,” असं राऊत म्हणाले. “फडणवीस हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधानं करू शकतात. जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही, असं भाजपाला वाटत असेल आणि जे कोणी भगवा फडकवणार आहेत तो शुद्ध आहे हे जनताच ठरवेल. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा असून गेली ५० वर्षे तो मुंबई महानगरपालिकेवर फडकत आहे,” असंही ते म्हणाले.

Exit mobile version