Marathwada Sathi

उद्धव ठाकरे यांच्याकडे न जाता राज्यपालांकडे का गेले राज ठाकरे हे राऊत यांना आत्ता समजले असेल

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोनाकाळातील वाढीव वीज देयकांतून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्दय़ावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घूमजाव केले.’वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल’? असा सवाल करत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली. त्यामुळे वीज सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“आता संजय राऊत यांना समजलं असेल की राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न जाता राज्यपालांकडे का गेले. हे सरकार काहीच करणार नाही याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जनता जोवर रस्त्यावर उतरणार नाही तोवर सरकारचे डोकं ठिकाणावर येणार नाही,” असे म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला.त्यांनी पत्रकारांशी बोलतांना या विषयावर संवाद साधला.

“वाढीव वीजबिलं दिलेली आहे. अशी अनेक कार्यालयं आहेत जी सहा सहा महिने बंदी होती त्यांनाही मोठी बिलं आली आहेत. याचे सरकार उत्तर द्यायला तयार नाही. युनिटचा दरही सरकारने कंपन्यांना वाढवून दिला आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. लॉकडाउनच्या कालावधीत लोकांकडे कामधंदे नाहीत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, कर्जाचे हप्ते आहेत अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याऐवजी लोकांच्या खिशात हात घालण्याचं काम सरकार करत आहे. याबद्दल प्रचंड राग आणि संताप लोकांच्या मनात असल्याचेही देशपांडे म्हणाले.

Exit mobile version