औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. आता प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन संदर्भात महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. येत्या ११ मार्च पासून ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच या कालावधीमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले.
या अंशतः लॉकडाऊन मध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, क्रीडा मैदाने (केवळ सरावासाठी सुरू), शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असतील. यात महत्वाचे म्हणजे मंगल कार्यालय, सभागृह यात होणारे सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
शनिवार व रविवारच्या लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा, मीडिया ऑफिस, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील.
१५ दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक
खाजगी व कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र सर्वांनी सोबत बाळगावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले