मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत असताना म्हणाल्या की,जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी आहे. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती.यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल,असेही त्या म्हणाल्या.
पुढे धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत बोलत त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नाते म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केले नसते आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच.”