मराठवाडा साथी न्यूज
कोल्हापूर : जम्मूमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या भयानक हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील,करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील जवान ‘संग्राम शिवाजी पाटील’ याला शुक्रवारी मध्यरात्री वीरमरण आले. ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.
आठवडाभरापूर्वीच पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ‘ऋषिकेश जोंधळे’ यास वीरमरण आले होते. दिवाळीच्या दिवशीच त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच अजून एका जवानाला जम्मू-काशीरामध्ये वीरमरण आले.
शहिद जवान ‘संग्राम पाटील’ हा सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये कार्यरत होता. अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झालेल्या संग्रामची १७ वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देश सेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्याने मुदत वाढवून घेतली होती. पण शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी त्याचे पार्थिव कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर गावातील लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.