मराठवाडा साथी न्यूज
पाथर्डी: पाथर्डी- गेले तीन आठवड्यापासून तालुक्यात नरभक्षक बनू लोकांची झोप उडवलेला बिबट्या आज पहाटे सावरगाव मायंबा परिसरात जेरबंद झाला. वन विभागाच्या तिसगाव,आष्टी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या पथकाला संयुक्त मोहीम मध्ये यश आले.
नगर विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड व नगर विभागाकडून सुमारे 25 पिंजरे गर्भगिरी डोंगररांगांमध्ये लावण्यात आले. नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना आदी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून अधिकारी-कर्मचारी बिबट्या शोधमोहिमेत गेले आठ दिवस अहोरात्र काम करत होते. शार्प शुटर, बेशुद्ध करण्यासाठीची औषधे, सर्चलाईट, नाईट कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, शूटगन, फटाके, ठसेतज्ञ अशी पथके तालुक्यात कार्यरत होती.
मढी केळवंडी व शिरापूर येथील तीन बालके बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष “ऑपरेशन पाथर्डी” कडे लागून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा प्रस्ताव वनविभागाकडून नागपूर कार्यालयाला सादर झाला. अन्य ठिकाणाहून बिबटे गर्भगिरी डोंगर रांगांमधील जंगलामध्ये वनविभागाकडून आणून सोडले जात असल्याचा मुद्दा गेले 15 दिवस तालुक्यात लक्षवेधी ठरला. पकडलेला बिबट्या नरभक्षक आहे का याची तपासणी नगरला होऊन नंतर त्याला सोडले जाईल अशी माहिती सूत्राकडून मिळाली.
बिबट्याने तीन चिमुकल्यांचा घेतला होता बळी
तालुक्यातील केळवंडी येथे 8 वर्षीय बालकाला, तर मढी येथील 3 वर्षीय चिमुरडीला बिबट्याने पळून नेऊन ठार केले होते. तसेच मढी-शिरापूर परिसरातील कराड वस्ती येथे एका चार वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती. यामध्ये तिघांचाही बळी गेला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते