Marathwada Sathi

दिल्ली हिंसाचारप्रकरणी राकेश टिकैतसह २० शेतकरी नेत्यांना नोटीस

उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत

दिल्ली : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काढण्यात आलेल्या, ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान मोठा हिंसाचार घडला. यामध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले. एवढच नाही तर आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढून त्या ठिकाणी तोडफोड करत, वेगवेगळे झेंडे फडकविले.या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलिसांकडून कडक पावलं उचलली जात असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी २० शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवली असून, उत्तर देण्यासाठी त्यांना तीन दिवासांचा अवधी देण्यात आला आहे.

शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही, असा दावा करत हिंसाचाराला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, अशा शब्दांत कडक कारवाईचा इशारा कालच दिल्ली पोलिसांकडून जाहीर पत्रकारपरिषदेतून देण्यात आला होता.यानंतर आज योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा, बलबीर एस राजवाल व भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्यासह २० शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलीस व शेतकरी नेत्यांमध्ये जो करार झाला होता, तो शेतकरी नेत्यांनी मोडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शिवाय, या नोटीसीला उत्तर देण्यासाठी शेतकरी नेत्यांना तीन दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे.

Exit mobile version