मुंबई : राज्यात बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम थेट मटणाच्या महागाईवर झाला असून अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी मटणाच्या भावात वाढ केली आहे. त्यामुळे झणझणीत मटणाचा रस्सा खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे त्याचा परिणाम आता मटणाच्या दारावर झाल्याचे चित्र दिसतंय. बर्ड फ्लू अगोदर अनेकलस ठिकाणी 450 ते 500 रुपये प्रतिकिलो विकले जाणारे मटण आता 650 रुपयांच्या जवळपास विकले जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्याचवेळी चिकनच्या दरात घट होऊन त्याची विक्री प्रतिकिलो 100 रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. पण त्याला म्हणावी तशी मागणी नाही.
मटणासाठी बोकड मिळणे कमी झाल्याने हे दर अजून वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सध्या बोकडाच्या मटणाची मागणी वाढत असली तरी बोकडाची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम मटणाच्या किंमतीवर झाला आहे. मटण साधारण 700 ते 750 या दराने विकले जात आहे. मटणासाठी बोकड मिळत नसल्याने अनेक मास विक्रीची दुकाने दिवसेदिवस बंद राहत आहेत.या आधी 300 रुपये किलोने जाणारी गावरान देशी कोंबडी आता 160 रुपयालाही विकली जात नाही . हीच अवस्था बॉयलर कोंबडीची झाली असून आता बॉयलर कोंबड्या 130 ते 150 रुपयाच्या आसपास विकल्या जात आहेत. बर्ड फ्लूचा परिणाम अंडी विक्रीवरही झाला असून 8 रुपयाला विकली जाणारी देशी अंडी आता 3 रुपयालाही कोणी खरेदी करीत नाहीत. बर्ड फ्लू च्या भीतीमुळे ग्रामीण भागातील कोंबड्या मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांचे अर्थचक्रच बिघडले आहे.