उस्मानाबाद । आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे, गरज पडल्यास तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. येत्या 15 ऑक्टोबरला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले की, 1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचे आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नये आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये. माझ्या रक्तात शिवाजी आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठा समाजात गट पाडणाऱ्याचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहनही संभाजीराजेंनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, एक राजा बिनडोक आणि दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून इतर मुद्द्यांवर अधिक भर आहे. यावर संभाजीराजेंनी संयमी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे विचारवंत आहेत. त्यांनी माझा अवमान केला नाही. पण त्यांनी अयोग्य शब्द वापरले.