Marathwada Sathi

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी उचलले

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने राज्यभरात मराठा समाज बांधव आक्रमक भूमिकेत आहेत. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सरकार विरोधात दंड थोपटून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या सहा पदाधिकाऱ्यांना पुंडलिक नगर पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले.

रमेश केरे पाटील, रवींद्र काळे पाटील, शैलेश दिघे, ज्ञानेश्वर गायकवाड आणि झिरपे पाटील या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी सकाळी ताब्यात घेतल्याचे पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. यातील केरे पाटील आणि काळे पाटील यांना ताब्यात घेऊन अन्य पदाधिकाऱ्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देसाई शहरात असल्याने हे सर्वजण आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने कारवाई करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मराठा समन्वयकांना अटक का? आबासाहेब पाटील यांचा सरकारला सवाल

राज्यात सध्या मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. अशावेळी स्थानिक मराठा समन्वयकांना का अटक केली जात आहे? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मराठ्यांची धरपकड करुन जेलभरती करायची असेल तर सरकारनं स्पष्ट सांगावं. पाच कोटी मराठा समाज स्वत: जेलभरो करेल, असा आव्हानही आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे

Exit mobile version