अर्णब गोस्वामी अटकेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जरआमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही.तसंच मुंबई, महाराष्ट्र पोलीस सूडबुद्धीने कारवाई करत नाहीत,या संदर्भात पोलिसांच्या हाती काही पुरावे, धागेदोरे सापडले असतील. ही कारवाई पोलिसांनी केली आहे. त्या कारवाईचा सरकार किंवा एखाद्या पक्षाशी संबंध असल्याचं कोणतंही कारण नाही.” असेही त्यांनी सांगितले.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक हा काळा दिवस असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तर महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असे विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचे म्हटले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत भाष्य करत सरकारची पाठराखण केली आहे.