मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली पाहिजे. माझी वसुंधरा अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रम राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शाश्वत विकासाची कामे टाळेबंदीच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदूषणामध्ये मोठी घट झाली आहे . आपण विकास करताना झाडांची कत्तल करतो आणि तोच विकास झाल्यानंतर रस्त्यांवर प्राणवायू मिळविण्यासाठी यंत्राचा वापर करतो. विकासातला हा असमतोल दूर करून पर्यावरणपूरक अशा शाश्वत विकासाची कास आपल्याला धरावी लागेल.राज्यात पर्यावरण वातावरणीय बदल विभागाला संपूर्ण पाठबळ आहे.पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही .