Marathwada Sathi

हाथरसच्या आरोपींचे पत्र : आई आणि भावाच्या मारहाणीमुळे पीडितेचा मृत्यू

उत्तर प्रदेश । हाथरस प्रकरणातील सर्व चार आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं असून पीडितेचा मृत्यू तिच्या आई व भावाच्या मारहाणीमुळे झाल्याचे म्हटले आहे. पत्रात म्हटले आहे की, पीडितेसोबत मैत्री होती. एकमेकांसोबत बोलणेही होत असे. परंतु, पीडितेला मारहाण आरोपींनी केलेली नाही. त्या पत्रात आपण निर्दोष असल्याचे चारही आरोपींनी म्हटले आहे. पत्रात चारही आरोपी संदीप, रामू, रवी आणि लवकुश यांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसेही आहेत.
आरोपींनी पत्रात म्हटले आहे की, त्यांची पीडितेसोबत मैत्री होती. फोनवरही बोलणे होत असे. याच कारणामुळे त्या दिवशी आई आणि भावाने पीडितेला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडितेला पाणीही पाजलं होतं. परंतु, उलट त्यांनाच या प्रकरणात अडकवण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही आरोपींनी केली आहे.
दरम्यान, हाथरस प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे. बुधवारी एसआयटी अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र सकाळीच एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केले, तसेच शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहेत. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचे पोर्स्टमार्टम केले. पोर्स्टमार्टम अहवालानुसार, मानेचे हाड मोडल्याने पीडितेचा मृत्यू झाला आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन आणि हार्ट अटॅकही आला होता. तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाल्याचे अहवालात नमूद आहे.

Exit mobile version