Marathwada Sathi

बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या…!

मराठवाडा साथी न्यूज

अमरावती : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याकडून झालेली फसवणूक आणि त्यासोबतच पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून अशोक पांडुरंग भुयार (वय ५५,रा.धनेगाव)या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी(२२ डिसें)सकाळी ११ वाजेच्या सुमारास सर्वांच्या समोर आली. याप्रकरणी काल(२२ डिसें)सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिठ्ठीमध्ये काय लिहिले आहे

शेतकरी अशोक भुयार यांनी त्यांच्या धनेगाव येथील शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला. मात्र, त्या दोन व्यापाऱ्यांनी भुयार यांना शेतामध्ये दारू पाजून संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेतली. मारहाणदेखील केली. त्याबाबतची तक्रार देण्यास ते धनेगाव येथील पोलीस पाटलासह अंजनगाव पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गेले,मात्र त्याठिकाणी बीट जमादार व ठाणेदाराने त्यांना मारहाण केली,असे लिहून अशोक भुयार यांनी चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

दरम्यान,संपूर्ण घडलेल्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक व दोन संत्रा व्यापाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी दिली.

Exit mobile version