मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात यायचे असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा. अन्यथा तुम्हाला पुन्हा पाठविण्यात येईल, असे राज्य सरकारने नव्या नियमावलीत नमूद केले आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येताना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे लागेल.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थान मधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचे नोटिफिकेशन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.