Marathwada Sathi

अर्थतज्ज्ञांकडून नव्या कृषी कायद्यांचे समर्थन…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.२६ जाने.म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच त्यावरुन दिल्लीत मोठा हिंसाचार बघायला मिळाला.त्याचवेळी आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी मात्र या कायद्यांचे समर्थन केले आहे.

गीता गोपीनाथ यांनी भारतातील कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे.पण हे समर्थन करताना त्यांनी शेतकऱ्यांना सामाजित सुरक्षेची पूर्ण हमी देण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.याविषयी अधिक बोलत त्या म्हणाल्या की,”भारत सरकारचे हे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील. या कायद्यांची अंमलबजावणी झाली तर शेतकरी आपल्या उत्पादनाची विक्री कोणत्याही कराविना बाजार समित्यांच्या क्षेत्राच्या बाहेर करु शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. “

दरम्यान,”कोणत्याही मोठ्या सुधारणा लागू केल्यानंतर ठराविक काळापर्यंत त्याची काही किंमत चुकवावी लागते. त्यावेळी दुर्बल शेतकऱ्यांना त्याचा तोटा होण्याची शक्यता असते. म्हणून अशा शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असते. आता एक निर्णय घेण्यात आला आहे, त्याचा परिणाम आगामी काळात दिसून येईल”असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version