Marathwada Sathi

नामांतरावरून शिवसेना -काँग्रेसमध्ये मतभेद

“नामांतराचे राजकारण खेळू नये” – बाळासाहेब थोरात

मुंबई: औरंगाबादच्या “संभाजीनगर “ नामांतरावरून शिवसेना काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवर औरंगाबादचा “संभाजीनगर ” असा उल्लेख करण्यात आला आहे. तर शासकीय व्यवहारातही संभाजीनगर नाव वापरण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयातही संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याची आठवण काँग्रेस करुन देत आहे. दुसरीकडे भाजपा शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची टीका करत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध असल्याचं म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी :
“माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”.असे ट्विट करत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या नामांतरावरून महाआघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version