Marathwada Sathi

गेवराई बायपासवर कार आणि टँकरचा भीषण अपघात

बीड / सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गा वरील गेवराई बायपासवर कार आणि टॅंकरच्या झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले असून अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये लातूर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव भिंगे यांचा समावेश आहे. सदरील अपघात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रा. सदाशिव भिंगे हे आपली हुंडाईची कार क्र. एम एच ४६ / बी- ९७०० मधून लातूरहून औरंगाबादकडे घरगुती कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांची कार गेवराई बायपासवर आले असता झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या इंडियन ऑइलच्या कंटेनरवर धडकली. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव भिंगे, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. सकटे, प्रा. गडदे यांचा समावेश असून राम भिंगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Exit mobile version