मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर मुंबई महानगरपालिकेने केलेली कारवाई न्यायालयाने अवैध ठरवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजप नेते पुन्हा एकदा ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे.
महापालिकेनं बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करताना ते कार्यालय पूर्ववत करुन द्यावे असा आदेश महापालिकेला दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला घेरले आहे. तसेच,कंगनाच्या कार्यालयाच्या नुकसानीचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा, या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला, असा टोला त्यांनी लगावला आहे.’उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अर्णब गोस्वामी पाठोपाठ पुन्हा एकदा ठाकरे सरकारचं थोबाड फुटले आहे. कंगनाला नुकसानभरपाई द्यावी लागणं हे सरकारच्या सुडाच्या राजकारणावर प्रकाश टाकणारं आहे. या सगळ्या कारवाई मागचा धनी राज्याच्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याचे प्रायश्चित्त घ्यावे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.