भाजप सरकारच्या काळात जीएसटी, नोटाबंदी यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्यात कोरोनाचे संकट आले. सध्या देशातील जीडीपी वजा ६ आहे. खरे तर भाजप सरकार हेच देशावरचे मोठे संकट आहे, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यात एका कार्यक्रमात डॉ.तांबे बोलत होते.
तांबे पुढे म्हणाले की, मागील सहा वर्षात एकही विकासाचे काम भाजपने देशात केले नाही. फक्त धार्मिक भावना भडकावून द्वेषाचे राजकारण वाढवले आहे. नोटबंदीचा घाई घाईत घेतलेला निर्णय, जीएसटी यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्यातच आता कोरोनाच्या संकटाची भर पडली. खरेतर कोरोना संकटाबरोबर भाजप सरकार हेच देशावर आलेले मोठे संकट आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, देशातील लोक मोदी सरकारला कंटाळले असून आगामी काळात सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही, असे आ.तांबे म्हणाले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यावर संकटांची मालिका सुरूच आहे. मार्चपासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती मंदावली आहे. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ विदर्भातील पूर परिस्थिती आणि आता सततचा पाऊस यामुळे संकटा मागून संकट येत आहेत. तरीही लॉकडाउनमध्ये उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद असतानाही राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अशी दहा हजार कोटींची मदत शेतकरी व सर्वसामान्यांसाठी जाहीर केली आहे.